
चिखली (योगेश्वर बोंद्रे) – खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचावे, यासाठी मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, डोडरा शिवारातील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. शेळगाव आटोळ येथील पॉवर हाऊसजवळ २७ जानेवारीपासून या उपोषणाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
मागण्या व समस्यांचा आढावा :-
शेळगाव आटोळ येथील पाणीपुरवठा टेल पॉइंटपर्यंत होणार असल्याचे पाटबंधारे विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात पाटाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. याशिवाय, पाटांच्या चाऱ्या अपूर्ण असल्याने शेती धोक्यात आली आहे. आंचरवाडी येथून थेट शेळगाव आटोळपर्यंत पाणी पोहोचावे, पाटाचे अपूर्ण काम पूर्ण करावे आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळावे, अशा मागण्यांसाठी भारत सुखदेव बोर्डे, श्रीकृष्ण सखाराम अंभोरे, आकाश अजितराव बोर्डे, दत्ता श्रीराम हरणे आणि ज्ञानेश्वर हरिभाऊ मिसाळ यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
शासनाचा हलगर्जीपणा शेतकऱ्यांच्या विरोधात :-
गेल्या बारा वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भरोसा, रामनगर येथून शिवारांमध्ये पाणी पोहोचवण्याचे नियोजन केले गेले, मात्र प्रत्यक्षात पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा पाटाच्या चाऱ्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
आंदोलनाला वाढता पाठिंबा :-
शेळगाव आटोळ आणि मिसाळवाडी भागातील शेतकऱ्यांनी या उपोषणाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामुळे लवकरच प्रशासकीय यंत्रणेवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जर शेतकऱ्यांच्या मागण्या वेळेत मान्य केल्या नाहीत, तर आंदोलन व्यापक होईल, असे दिसते.
प्रशासनाची जबाबदारी :-
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढून पाटाचे अपूर्ण काम पूर्ण करावे आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत